औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अॅड. तानाजी चोंधे, निवृत्ती कलापुरे, डॉ. राहुल मनियार, डॉ. सुहासिनी सातपुते, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांच्यासह डॉ. तानाजी हातेकर, प्रा. डी. एस. पाटील, प्रा. प्रदीप भिसे, प्रा. सायली गोसावी, प्रा. कुशल पाखले, प्रा. मयुर माळी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. मणियार म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात दक्षिण अमेरिकेत तंबाखूचे अस्तित्व दिसून आले. त्यानंतर त्याचा जगभरात झपाट्याने प्रचार आणि प्रसार झाला. कष्टकरी व कामगारांमध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तंबाखूमधील निकोटीन या विषारी पदार्थामुळे माणसाला त्याची सवय लागते. तंबाखूमध्ये चार हजारांहून अधिक विषारी रसायने आहेत. भारतामध्ये साधारणपणे चौदा कोटी पुरुष आणि चार कोटी महिला तंबाखूचे नियमित सेवन करताना दिसतात. भारतात वर्षभरात ४३ लाख किलो तंबाखूचे सेवन केले जाते. भारतामध्ये प्रत्येक वर्षी वीस हजार कोटींच्या तंबाखूची विक्री केली जाते. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर भारत सरकारद्वारे मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, श्वासनलिका, मूत्रपिंड, गर्भाशय, मुखाचा कॅन्सर होतो. केसांना व तोंडाला दुर्गंधी येते. दात पडतात, हिरड्यांना इजा होऊन दातांवर चॉकलेटी पिवळे डाग पडतात. नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होते. अकाली वृद्धत्व येते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे तंबाखूचे सेवन करू नये.’
तंबाखू खाणे सोडल्यास माणसाचे जीवनमान सुधारण्याबरोबरच शारीरिक क्षमताही वाढेल. आत्मविश्वास वाढून आरोग्यवृद्धी होईल. समाज आणि कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल. यासाठीच व्यसन न करण्याचा प्रचार आणि प्रसार समाजात करणे गरजेचे असल्याचे डॉ. मणियार यांनी नमूद केले.
प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘कोणतेही व्यसन हे स्वतःसाठी आणि समाजहिताच्यादृष्टीने घातकच असते. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करायला हवी की, मी व्यसन करणार नाही आणि समाजातील व्यक्तींना व्यसन करू देणार नाही, तरच निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकेल. आनंदी आणि भरभरून जीवन जगण्यासाठी सर्वांनी व्यसनांपासून दूर राहावे.’
उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भक्ती पाटील यांनी आभार मानले. ‘आयक्यूएसी’ कमिटी चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.